Sunday, May 10, 2009

सफर

प्रवास, माझासाठी तरी प्रवास म्हणजे नेहमी एक वेगळा अनुभव असतो. प्रवास मला एक नवीन व्यक्तीचीच नाही तर एका नवीन जागेची आणि वेगळ्या अनुभवाची भेट देत असतो. खरंच वर्षात एकदा तरी आपण एका मोठ्या प्रवासाला जायला हवे (ट्रीप नाही, ट्रीप तर आठवड्यातून एकदा व्हायला हवी).

आजचा ब्लोग असाच एका प्रवासा बद्दलचा आहे. जळगाव ते नवसारी, एप्रिल २००८, मी आणि बहिणेचे सासरेबुवा आम्ही जळगावचा बस स्थानकावरून सकाळी सुमारे ११ वाजता निघालो. जळगावच एप्रिल महिन्यातलं उन आणि गाडीतील गर्दी यामुळे खूप चिडचीड झाली होती. नशिबान आम्हाला जागा मिळाली. थोड्याच वेळात गाडीने वेग घेतला. आम्ही जळगावचा बाहेर पडलो आणि मला कधी झोप लागली ते कळलेच नाही.

साधारण एक दोन तासानंतर जाग आली तेव्हा आम्ही साक्रीचा आसपास होतो. बाहेरील द्रुश्य मी विचार केला होता त्या पेक्ष्या खूप वेगळं होतं. बाहेर जमीन पार ओसाड दिसत होती. बर्याच दूर पर्यंत खूप कमी झाडं होती. बरेच शेतकरी आपल्या जागेची मशागत करत होते. पुढील एक दोन तासाचा प्रवास असाच झाला.

सुमारे दुपारचा २ चा सुमारास आमची गाडी एका रेल्वेफाटका पाशी थांबली. आम्ही नेमके कुठे होते ते कळले नाही. पण गुजराथ बोर्डर चा आसपास असेल असा माझा अंदाज. आधीपासुनच तिथे बरीच वहाने थांबली होती. आमची गाडी थांबताच एका झाडाखालील मुलींचा ग्रुप आनंदात पेरू आणि काकड्या विकण्या साठी आला. बस आल्या मुळे त्यांना खुप आनंद झाला होता. त्यातील एक मुलगी खुप उत्साहित होती. तिचा हातात मावतील असे सहा पेरू ती प्रत्येक खिडकीत जाऊन विचारात होती. कोणी पेरू विकत घेतले तर पळत जाऊन झाडाखालील तिच्या छोट्याश्या दुकानातून परत आणत होती. असं करत ती माझाही खिडकी पाशी आली. मला भूख नसल्या मुळे मी नकार दिला. पण निराश न होता ती लगेच पुढच्या खिडकी कडे वळाली. तिच्यात असलेला उत्साह पाहून खरंच खुप प्रसन्न वाटलं. स्पर्धा ही होतीच. कोणी दुसरा आधी जाऊन एखाद्या खिडलीला पेरू तर नाही ना विकणार याची चिंता ही होती. आता तिने प्रत्येकाला दोनदा तरी विचारले असेल. साधारणता तिने १७-१८ पेरू विकले असतील. तिचा हातातील १५-२० रुपयांची चिल्लर ती मोजत होती आणि झालेल्या कमाई साठी खूप खुशही होती. बाहेरील कडक उन ती पार विसरली होती. तिचा उत्साह मात्र कमी नव्हता झाला. आता तिची नजर बसच्या पुढे उभी असलेल्या कलिंगडच्या गाडीवर पडली. तिचा चेहरा अजुन खुलला. हातातली चिल्लर तिने परत मोजली आणि पळत जात गाडीवर असलेल्या दोघांन पैकी एकाला विचारलं, "कलिंगड केवढ्याला दिलं?".
तो माणूस तिला पाहून आधी हसला आणि विनोदी स्वरात म्हणाला की, "तुझा कडे किती पैसे आहेत?".
तिला ते लगेच लक्ष्यात आले. पण हिम्मत न सोडता तिने जोरात विचारले, "कितीला दिलं ते सांग".
त्या माणसाचा विनोद आजूनही संपला नव्हता. तिचा कडे बघत तो म्हणाला, "५० रुपयाच आहे. बोल किती पाहिजे?".
मुलगी हातातील चिल्लर पुढे करत म्हणाली, "माझा कडे २२ रुपये आहेत. एक छोटा पाहून दे".
त्यावर मनुष्य परत हसला आणि म्हणाला, "२२ रुपयात कलिंगड येत नाही. कलिंगड मोठे आणि महाग आहेत".
आता मात्र मुलीचा चेहरा थोडा पडला होता. पण तरीही ती युक्ती लढवत म्हणाली. "मी तुला २२ रुपये आणि काही पेरू देते, मला एक कलिंगड दे."
माणसाला अजुन ही तिची दया आली नव्हती. तो मित्रा कडे बघत हसत म्हणाला, "ही वेडी पेरू देऊन कलिंगड विकत घेते आहे."

आता मात्र पोरीचा चेहरा पार पडला होता. नाराज होऊन ती परत झाडाखाली जाऊन उभी राहिली. स्वतःशीच काही तरी बडबडत होती. चिडली होती आणि नाराज झाली होती. दोन मिनिट वाटलं कि आपल्या हातातल्या ५० रुपयांची किंमत खरंच तिचा अनमोल आनंदा एवढी आहे? तिला बोलावून ते ५० रुपये द्यावेसे वाटले. पण ती आता परत बस पाशी येणार नव्हती. काही करून परत तिचा चेहऱ्या वरचा आनंद पाहण्याची इच्छा होती.

एवढ्यात एक बस आमच्या मागे येऊन उभी राहिली. बस पाहताच तिचा चेहरा परत खुलला. परत ती त्याच उस्ताहात बस कडे निघाली. २ मिनिट पूर्वीचे सगळ काही विसरत हातात सहा पेरू घेऊन बस कडे पळाली. तिचा चेहऱ्यावर तो आनंद आणि उस्ताह दोन पटीने परत आला होता. असं वाटलं की देवानेच ती बस पाठवली होती. त्याची महिमा खरंच वेगळी आहे. आयुष्याचा या प्रवासात त्याने सुखदुख्खाचा वाटा योग्य प्रकारे ठेवला आहे.

Tuesday, May 5, 2009

मनाची श्रीमंती

नेहमीचा प्रश्न, सुख म्हणजे काय? श्रीमंती आणि सुख हे एक मेकास पुरेसे आहेत का? अमेरिकेत आल्या नंतर खरच समजल की श्रीमती काय असते. पण सुखाचे काय? आजही त्या चहावाल्या बाईच्या डोळ्यात पाहिलेल्या सुखाची झलक मला इकडे दिसली नाही. बघायला गेलं तर एक वर्ष झालं पण आजही ती दुपार तेवढीच फ्रेश आहे माझा मनात.

मी आणि विजय आम्ही सांगवीच्या रूम कडे निघालो होतो. वातावरण आगदी प्रसन्न होते, थोडा पाउस ही होता. पण पुण्यात पावसाळा म्हटला की तो आलाच. विजयचा नेहमी प्रमाणे हट्ट चालला होता की मला Pulsar चालवायची, आणि बाकीच्या पण गप्पा चालल्या होत्या.

पावसाने मात्र थोड्याच वेळात आपलं रूप बदललं. पाउस आता जोरात पडायला लागला होता. आम्ही भिजून पार ओलेचिंब झालो. थंडीही वाजत होती. आमचा कडे बाजूला थांबण्या शिवाय पर्याय नव्हता. एका झाडा खालील चहाचा गाडी शेजारी bike थांबवली. त्या चहावाल्या बाईचाही पावसामुळे गोंधळ उडाला होता. बिचारी आपल्या गाडी आणि झाडाच्या आधारे एक प्लास्टिकचा पेपर बघून आपली सोय करत होती. तिचा मुलगा चहा आणि चूल सांभाळत होता. मुलगा साधारण ११वी मध्ये असेल असा माझा अंदाज. तिची मदत करावीशी वाटली पण का म्हणून शांत उभा राहीलो माहिती नाही. थोड्या वेळाने आम्ही २ चहा सांगितला. थंडीने आम्ही आधीच कुडकुडत होतो. तीने चहाचे २ ग्लास समोर ठेवले. चहा उचलताना माझा कडून एक चहा सांडला. तीने लगेच न सांगता दुसरा चहा दिला. पुढचे पाच दहा मिनिट आम्ही गरम चहाचा आनद घेत आम्ही पाउस थांबण्याची वाट पाहू लागलो.

आता पाउस थांबला होता. विजयला bike ची चावी देत म्हणालो की मी पैसे देऊन आलोच. त्या बाईना १० रुपयाची नोट देऊन पाच रुपये परत घेतलें. गाडी कडे परत येताना मनात calculations झालीत आणि लक्षात आल की आपण ३ चहाचे(२ + १ सांडलेला) ७.५ रुपये द्यायला हवे होते. मी परत जाऊन त्यांना २.५ रुपये देऊ केले.

पण ते नकारात त्या म्हटल्या की, "साहेब तुम्ही फक्त २ ग्लास चहा घेताला आणि त्याचे ५ रुपये होतात".
मी त्यांना आठवण करून देत म्हटलो की "माझ्याकडून एक चहा सांडला होता. त्याचे २.५ रुपये तुम्ही नाही घेतलें".
त्यावर त्या हसत म्हटल्या की, "अरे तो चुकीने पडला, त्याचे पैसे मी कसे घेऊ".
पण मी त्यांना आग्रह करत म्हटलो की, "चूक माझी होती, आणि हे तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत. तर तुम्हाला ते घ्यावेच लागतील".
त्यांनी परत ते पैसे नकारात म्हणाली, "पोरा, चूक ही चूकच आसते, सांडलेल्या चहाचे पैसे मी घेऊ शकत नाही पण हा तुला काही द्यायचे असेल तर देवाकडे माझ्या पोरासाठी एक चांगले भविष्य माग. तो शिकून सवरून तुझा सारखा नोकरीला लागला म्हणजे म्हणजे माझ्या मेहनतीचे फळ मला मिळेल".

दोन मिनिटं मी काय बोलावे तेच कळले नाही. तिच्या डोळ्यात मात्र एक समाधानाची झलक होती. इतक्या कष्टात पण मी इतकं सुखी आणि आनंदी कुणालाच नाही बघितलं.

त्या नंतर मी माझा रोजच्या पळापळीच्या जीवनात गुंतून गेलो. आज इकडे US मध्ये असतानाही जर त्या प्रसंगाची आठवण झाली तर जीवनात एक चेतना जगते आणि पळापळीच्या जगात एक क्षण थांबून परत लढण्याची शक्ती येते. त्या बाईच्या मनात असलेली श्रीमंती मी आज अमेरिकेतही कुणाकडे नाही पाहिली.

~सचिन.